माझा घरी भरपूर झाडे होती. कालांतराने जसं जसं बांधकाम वाढत गेलं तशी घरची बाग कमी कमी होत गेली.
मग अंगणातली झाडे कंपाऊंड च्या बाहेर जाऊ लागली. अंगण झाडांनी भरलेले असायचे त्यात तीन-तीन रंगांचे गुलाब, दोन-दोन रंगांचे जासवंद , ब्राह्मकमळ, कोरफड, कडीपत्ता हि प्रामुख्याने होती आणि भर म्हणून थोडी थोडी भाजी पण जोडीला असायची.
नंतर बाहेर च्या गाड्या आत येऊ लागल्या आणि आतील झाडे बाहेर जाऊ लागली.
अंगणाचे पार्किंग झाले आणि फूट-पाथ ची बाग होऊ लागली.
दारात आधी "शो" ची म्हणजेच फक्त दिसायला छान आणि सावली देणारी झाडे होती.
रस्त्या कडेला फळं आणि फुले लावली कि ती "आपोआप" गायब होतात म्हणून कधी लावलीच नाहीत.
घरी इतका मोठा देवरा आहे आणि देव आला कि पूजा आली आणि पूजा म्हंटलं कि फुले हि आलीच आली.
बिना फुल पूजा होणे अश्यकच, मग काय!!! फुले आता घरा समोर “दारात” येऊ लागली.
"शो" च्या झाडांची जागा फुलांच्या झाडांनी घेतली. फुले दारात परत हसू लागली.
माझा आवडीचं एक समीकरण आहे, "घर तेव्हाच शोभते जेव्हा दारात रांगोळी आणि रांगोळी शेजारी फुलाचे छान असे एक झाड असते".
सूर्योदय आधी आमच्या दारात रांगोळी असते आणि सूर्योदय बरोबर देवपूजा, हे नित्त्याचं आहे, ह्यात बदल नाही.
जेव्हा फुलांची रोपे छोटी होती, तेव्हा त्यांना आम्ही बरेच जपले. दररोज सकाळ संध्याकाळ पाणी, आठवड्यातून एकदा रोपा जवळ चे तन काढणे, किड नको म्हणून औषध फवारणे , महिन्यातून एकदा शेण-खत हा कार्यक्रम फिक्स होता. मग रोप थोडे मोठे झाले, त्याला छान असे हिरवे कापडाचे कंपाउंड केलं, जेणे करून रस्त्यावरील जनावर त्याला तोंड लावणार नाहीत.
बघता बघता रोपाचे रूपांतर छानश्या झाडा मध्ये होऊ लागले.थोड्याच महिन्यात त्याला एक कळी लागली.
कळी बघताच "आनंद पोटा मध्ये मावणा-मावणा" असं झालं. पाहिलं फुलं आलं आणि ते लगोलग आम्ही घरच्या देव्हाऱ्यात वाहिलं.
| मामा-भाची: अतिशयोक्ती फोटो पोज,,,,☺☺ |
बिचारा आमचा देव पण कदाचित बाहेर च्या फुलांना कंटाळला असावा, त्याला पण दारातील फुल पाहून प्रसन्न झाले असावे.
पण फुलांची झाडे दारात होती आणि फुले असली कि त्याला माणसांची नजर "आधी" लागते, मधमाश्या नंतर.
झाडावर लागणारी फुले जशी वाढली तशी फुलांची चर्चा देखील वाढू लागली.
शक्यतो कळ्या कोण तोडत नाही, फुल उमलले कि देवाला अर्पण करण्याची पद्धत असते.
थोड्याच दिवसात, झाडावरील कळ्या हळू हळू गायब होऊ लागल्या.
बरीच मंडळी झाडावर नजर ठेऊन असायची, उद्या उमलणारी कळी सकाळी उजेडायच्या आत गायब.
मनात असाच एकदा विचार आला,"पुण्य कुणाच्या नशिबी".
झाड लावल आम्ही, जपलं आम्ही, वाढवल आम्ही आणि त्याला लागलेली कळी कोण तर घेऊन जातं आणि देवाला अर्पण करतं.....!!!!
मग प्रश्न असा आहे कि "पुण्य कुणाच्या नशिबी", झाड लावून वाढवणाऱ्याला कि कळी देवाला अर्पण करणाऱ्याला...???
आणि एके दिवशी तिचं लग्नं होते. कोणतरी येते आणि जसं दारात वाढलेलं फुले तोडतात तसं तिला अलगद घरातून घेऊन जातं...!!!
फरक इतकाच कि इथं कधी कधी तिची संमती विचारली जाते...!!!
त्याच प्रमाणे, मुलगी तिच्या घरची पुण्याई सुघंधा प्रमाणे तिच्या माहेरून तिच्या सासरी घेऊन जाते आणि दोन्ही कडे तिची ठळक उपास्थी उठवते आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते.
छोटासा प्रयत्न "लग्न नंतर सून म्हणून नाही तर घरच्या मुली प्रमाणे त्यांच्या सासरच्या माणसांची काळजी घेणाऱ्या प्रत्येक मुली साठी"

No comments:
Post a Comment